अपघात टाळण्यासाठी कुंडलच्या क्रांती कारखान्याचा पुढाकार; ऊस वाहतुकीच्या वाहनांना बसविले रिफ्लेक्टर
कुंडल प्रतिनिधी :गळीत हंगाम सुरू झाला की गावोगावी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघातांची संख्या वाढते.हे अपघात टाळण्यासाठी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. कारखाना कुंडल यांच्यावतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले.क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह. कारखाना, कुंडल येथे कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड व कुंडल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या उपस्थित ऊस वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याचा उपक्रम संपन्न झाला.
असे घडतात रस्त्यावर अपघात...
ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्यावेळी रस्त्यावर उभी असतात. पाठीमागच्या बाजूस रिफ्लेक्टर नसल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना थांबलेली वाहने न दिसल्याने छोटे मोठे अपघात घडतात.यामध्ये मोठी जीवित व वित्त हानी होत असते.हे अपघात थांबवण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली, बैलगाड्यांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे.
ऊस वाहतूक करणारे वाहनास छोटे रिफ्लेक्टर,तसेच कापडी लाल रंगाचे रिफ्लेक्टर बसवणे, दारू पिऊन वाहन न चालवणे, ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी न लावणे, वाहतुकीचे सर्व नियम पाळणे, कारखान्याच्या आजूबाजूला रस्त्यावर वाहन लावताना सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याबाबत जयसिंग पाटील यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन केले. साखर कारखान्याचे मॅनेजमेंट स्टाफला त्यांच्याकडे ऊस वाहतुकीसाठी नोंद असलेल्या व ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना व बैलगाड्यांना रिफ्लेक्टर वाटप करावे, याबाबत सूचना देण्यात आल्या.यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच वाहनचालक उपस्थित होते.