भेदातीत राष्ट्र निर्माण करणे हे साहित्यिकांचे आद्य कर्तव्य - प्रा. डॉ.सुनीलकुमार लवटे ; औदुंबर येथे ८२ वे साहित्य संमेलन उत्साहात
संवाद न्यूज औदुंबर :
सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे हे साहित्याचे काम आहे. माणसा-माणसांत माणुसकी असावी त्यांच्यामध्ये जात नसावी. आपण परंपरेने निर्माण केलेले भेद नष्ट करून भेदातीत राष्ट्र निर्माण करणे हे साहित्यिकांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. सदानंद साहित्य मंडळाचे वतीने मसंक्रातीनिमित्त आयोजित ८२ व्या साहित्य संमेलनात ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सदानंद सामंत,कवी सुधांशु, म.भा.भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यापुढे बोलताना ते म्हणाले की,औदुंबरचे साहित्य संमेलन हे सामान्य माणसांनी सामान्यांसाठी चालविलेली साहित्य चळवळ आहे. कवी सुधांशु, म.भा.भोसले यांनी साहित्य चळवळीला प्रेरणा दिली. सदानंद साहित्य मंडळाकडूने महाराष्ट्राला साहित्य संस्कार दिला आहे. तुकारामांनी जनभाषेत जनकल्याणासाठी अभंग रचना केल्या. समाजात काहीतरी बदल घडावा म्हणून लेखक लिहित असतो. जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होत आहे.जातीचे खोटे आत्मे नष्ट झाले की माणूस मोठा होतो.
धर्म हा कर्तव्यानी ठरतो.येथून पुढच्या काळात धर्मांनी नाही तर मूल्यांनी जगायला सुरुवात करावी लागेल.जीवनतत्वे ही साहित्याची मूलतत्वे ठरावित. भेदातीत समाज निर्माण होणारी शैक्षणिक धोरण राबविण गरजेचे. जे सर्व बंधनातून मुक्त करते ते शिक्षण होय. साहित्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य माणसाच्या मनात कोलाहाल निर्माण करणे होय.भारतात साहित्यिकांचा हवा तितका सन्मान होत नाही. साहित्यिकांचा सन्मान करणारे देश जगातील प्रगती पथावरचे देश बनलेत.प्रश्न पडले की साहित्य निर्मिती होते. समाज नि:प्रश्न बनत आहे. सजग मतदार निर्माण करण हे साहित्याचं आव्हान. साहित्यिकांच काम समाजाला जाग करण आहे. वैचारिक साहित्य वाचल्याशिवाय परिवर्तन होणार नाही.
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री सोनाली नवांगुळ, सुभाष कवडे, प्रा.संतोष काळे,लेखक विजय जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रा.सौ.भारती पाटील यांच्या अदिम दुःखाचे वर्तुळ या काव्यसांग्रहास २०२४ चा कवी सुधांशु पुरस्कार तर मन्सूर जमादार यांच्या अनुभव तरंग या काव्यसंग्रहास सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैशाली पाटील यांच्या महाराज सयाजीराव गायकवाड या चरित्र ग्रंथाचे तर प्रा.अशोक बाबर यांच्या संगीत पंचगंगा या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उद्योजक गिरीश चितळे, डॉ. प्रदीप पाटील, कवीसंमेलनाध्यक्षा कवयित्री लता ऐवळे - कदम, आप्पासाहेब पाटील, अंकलखोपच्या पोलिस पाटील सौ.सुनिता पाटील आदी मान्यवरांसह साहित्यिक रसिक उपस्थित होते. सौ.नुपूर जोशी, वासुदेव जोशी, वरद जोशी, विभव जोशी यांनी स्वागतगीत सादर केले. शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुभाष कवडे यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. ह.रा.जोशी यांनी दिवांगताना श्रद्धांजली वाहिली. वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले.