साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन
संवाद न्यूज भिलवडी :
साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वरचित काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती केंद्र प्रमुख सुभाष कवडे यांनी दिली आहे. ही स्पर्धा इयत्ता सहावी ते नववी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी अभिजात मराठी, भाषा माझी आई, भारतीय संस्कृती हे विषय आहेत.या स्पर्धेत प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी कविता स्वतः लिहिल्याचे माननीय मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे. कविता 31 जानेवारी 2025 पर्यंत पोहोचतील अशा बेताने सुभाष कवडे साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली या पत्त्यावर पाठवाव्यात .पहिल्या पाच यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्रे पुस्तके भेट देण्यात येतील .बक्षीस वितरण समारंभ 27 फेब्रुवारी रोजी होईल. मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून या स्पर्धा आयोजित केल्याची माहिती सुभाष कवडे यांनी दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असेही आवाहन संस्कार केंद्राने केलेले आहे वाचन आणि लेखनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी या हेतूने गेली वीस वर्षे या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.