पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने 'चला विचार तरी करूयात' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य. एल डी कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय चव्हाण, पक्षीमित्र संदीप नाझरे, प्रा.काकासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी संदीप नाझरे यांनी पक्षी आणि अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले तर चव्हाण यांनी अंधश्रद्धा निर्मूलन प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी अंनिसचे उदय चव्हाण म्हणाले,नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येने विवेकाचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. तर शिक्षणाने तो आणखी बुलंद होईल. माणसे मेली तरी विचार मरत नसतात. अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाची कास धरावी लागेल. आपली जन्मदात्री आई आणि वडील हेच आपले दैवत आहेत. तर सावित्रीबाई फुले याच शिक्षणाच्या खऱ्या देवता आहेत.
स्वतःला चांगल्या विचारांची लगाम घाला. तरच तुम्ही चांगली व्यक्ती बनाल. स्वतःवर इतका विश्वास ठेवा की देवालाही वाटले पाहिजे की तुम्ही यशाचे खरे हक्कदार आहात.
कर्मकांडात न अडकता विवेकाने वागा. विचारांना विवेकाची, विज्ञानाची जोड दिल्यास अंधश्रद्धा निर्मूलन सहज शक्य आहे.या कार्यक्रमाचे स्वागत प्रा.खाडे तर आभार प्रा. कोणे यांनी मानले.