कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या लॉक डाऊन सुरू आहे, अशातच अत्यावश्यक सेवे शिवाय कोणालाही फिरण्यावर बंदी आहे. तसेच जिल्ह्यामध्ये कर्ज प्रकरणासाठी लागणाऱ्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झालेला आहे.शिक्षक बँकेने कर्जासाठी स्टॅंपची सक्ती करु नये अशी मागणी संचालक अविनाश गुरव यांनी केली आहे.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांना घरातील इतर आजार व कोरोना रुग्णांचा उपचार, पाल्यांची ऑनलाईन शिक्षण फी, शेती व इतर घरगुती अडचणी यासाठी कर्जाची आवश्यकता असतानाही स्टॅम्प मिळत नसल्यामुळे सदरची कर्ज प्रकरणे मंजुरीशिवाय तशीच पडून आहेत.अगोदरच शिक्षक बँकेच्या कर्जावरील व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत ज्यादा असल्यामुळे बहुतांश सभासदांनी कर्जासाठी इतर बँकांची वाट धरलेली आहे, अशातच स्टॅम्प मिळत नाहीत या कारणासाठी सभासदांची अडवणूक केली तर उरलेसुरले सभासद ही पर्याय शोधण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.
शिक्षक बँकेने स्टॅम्प मिळत नसताना सभासदांकडून त्याबाबत प्रतिज्ञा पत्र लिहून घेऊन किंवा स्टँप ड्युटीची आगाऊ रक्कम बँकेकडे भरणा करून घेऊन त्यांना कर्ज द्यायला हवे. किंवा रयत सेवक बँकेप्रमाणे कर्ज रोख्यावरच स्टॅम्प ड्युटी भरलेला शिक्का यासारखी व्यवस्था याअगोदरच करणे आवश्यक होते, त्यासाठी बँकेच्या कारभाऱ्यांनी बँकेचे ऑडिटर किंवा जिल्हा उपनिबंधक यांच्याशी पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. परंतु सभासदांच्या हिताचा विसर पडलेले सत्ताधारी हे करतील असे वाटत नाही. सध्या शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत आर्थिक अडचणी कधीही थांबत नाहीत तरी कोवीड कर्ज म्हणून विषेश कर्ज नऊ टक्के व्याजाने सभासदांना उपलब्ध करून द्यावे. अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यापुढील काळामध्ये शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, पोपटराव सूर्यवंशी, अरुण पाटील, हंबीरराव पवार, तानाजीराव खोत यांच्या नेतृत्वाखाली सभासद जागृतीची मोहीम उघडण्यात येणार असून सत्ताधारी चले जाव हा हि कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे संचालक अविनाश गुरव यांनी दिली. यावेळी शामगोंडा पाटील, सुधाकर पाटील, महादेव हेगडे, बाजीराव पाटील, शोभा पाटील उपस्थित होते.