सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर गावात जन्माला आलेल्या शिवाजीराव पाटील अण्णांनी संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शिक्षकांचे नेतृत्व केले. अण्णांच्या या कणखर नेतृत्वामुळे सर्व शिक्षकांना खऱ्या अर्थाने स्थैर्य प्राप्त झाले असून प्राथमिक शिक्षकांच्या संघटनात्मक चळवळीत शि.द.अण्णा यांचे कार्य महान असल्याचे मत जिल्हा परिषद सांगलीच्या अध्यक्षा प्राजक्तताई कोरे यांनी येलूर मध्ये आयोजित माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव पाटील जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. शि.द. अण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कोरोना काळात मयत झालेल्या शिक्षकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी सांगली जिल्ह्यातील विद्यार्थीप्रिय,उपक्रमशील व शाळेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या चाळीस गुणवंत शिक्षकांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्याचे कार्य जिल्हा परिषद स्तरावरून केले असून इथून पुढेही संघटनांना विश्वासात घेऊन सर्व प्रश्न सोडवले जातील असा विश्वास शिक्षण सभापती आशाताई पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
शि.द. अण्णा पुन्हा होणे नाही पण अण्णांनी उभी केलेली शिक्षकांची चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी अण्णांचे नातू धैर्यशील पाटील यांनी महाराष्ट्राचे युवा नेतृत्व म्हणून पुढे यावे असे मत अर्थ व बांधकाम समिती सभापती जगन्नाथ माळी यांनी व्यक्त केले.
अधिवेशनाच्या माध्यमातून 2 ते 3 लाख शिक्षकांना एकत्र करण्याचे कौशल्य फक्त आणि फक्त आण्णा मध्येच होते .त्यामुळे अण्णांच्या हाकेला संपूर्ण मंत्रिमंडळ शिक्षकांच्या अधिवेशनाला उपस्थित राहत होते. अण्णांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळणे ही शिक्षकांसाठी भूषणावह बाब असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव दादा शिंदे यांनी व्यक्त केले.
अण्णांना आम्ही लहानपणापासून पहिले असून त्यांची कमी प्रकर्षाने जाणवत आहे. पण धैर्यशील पाटील यांच्यात अण्णांची छबी दिसत असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडीक यांनी व्यक्त केले.
शिक्षक संघाचा एक प्रतिनिधी जिल्हा परिषद शिक्षण समिती वरती घेण्याचा शासन आदेश असून तो प्रतिनिधी शिक्षक संघाचा घ्यावा अशी मागणी धैर्यशील पाटील यांनी केली. तसेच संघटनेमध्ये दुही निर्माण करणाऱ्यांना योग्य जागा दाखवणार असा इशारा ही दिला. अण्णांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी सर्वच गुणवंत शिक्षकांनी हजेरी लावली होती. सदर कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने शिक्षक उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी केले तर स्वागत सरचिटणीस राहुल पाटणे यांनी केले आणि आभार आटपाडी तालुका अध्यक्ष यशवंत गोडसे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पा बिराजदार सर यांनी केले.यावेळी ग.चि.ठोंबरे नाना, महावीर बस्तवडे ,जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी, येलूरचे माजी सरपंच राजन महाडीक, सातारा शिक्षक बँकेचे संचालक ज्ञानेश्वर कांबळे, विजयकुमार चव्हाण ,जगन्नाथ कोळपे, मधुकर जंगम, सुनिता पाटील ,मारुती देवडकर ,दिलीपराव खोत ,उत्तम पाटील, सचिन खरमाटे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.